संविधानाची ओळख इयत्ता सातवी स्वाध्याय

धडा.पहिला. संविधानाची ओळख: नागरीशास्त्र

प्र.१. पुढील संकल्पना स्पष्ट करा .
१ ) संविधानातील तरतुदी

उत्तर: संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात . उदा. नागरिकत्व , नागरिकांचे हक्क , नागरिक आणि शासनसंस्था यांच्यातील संबंध , शासनाने करायच्या कायदयांचे विषय , निवडणुका , शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकारक्षेत्र इत्यादी . संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे . असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते . इतिहास , समाजरचना , संस्कृती , परंपरा इत्यादी बाबतींत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते . त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात . त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते.


( २ ) संविधान दिन

उत्तर: संविधान पूर्ण लिहिण्यासाठी २ वर्ष ११ महिने १७ दिवस इतका कालावधी लागला. संपूर्ण संविधान लिहून झाल्यानंतर संविधान सभेत त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला. म्हणून२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.


प्र.२. चर्चा करा .
१ ) संविधान समितीची स्थापना केली गेली.

उत्तर: भारताच्या संविधान निर्मितीला इ.स .१ ९ ४६ पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र राज्यकारभार ब्रिटिशांनी भारताचा तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायदयानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता . त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती ‘संविधान सभा’ म्हणून ओळखली जाते.

२ ) डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.

उत्तर: डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली . अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या . संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे , त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे , तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुदयात फेरबदल करण्याचे , प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी केले . भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना ‘ भारतीय संविधानाचे शिल्पकार ‘ म्हणतात .

३ ) देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी.

उत्तर: देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला , बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात . कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात . थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात . इत्यादी बाबींचा समावेश असतो.

प्र.३. योग्य पर्याय निवडा .


१ ) कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?
अ ) अमेरिका, क ) इंग्लंड, ब ) भारत, ड ) यांपैकी नाही.

उत्तर: इंग्लंड


( २ ) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
( अ ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर, ( ब ) डॉ . राजेंद्रप्रसाद, क) दुर्गाबाई, ड) बी. एन. राव.

उत्तर: डॉ . राजेंद्रप्रसाद,


३) खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?
अ) महात्मा गांधी ब) मौलाना आझाद क) राजकुमारी अमृत कौर ड) हंसाबेन मेहता.

उत्तर: महात्मा गांधी

४ ) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

अ ) डॉ. राजेंद्रप्रसाद ब ) सरदार वल्लभभाई पटेल क ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर ड ) जे.बी.कृपलानी

उत्तर: डॉ . बाबासाहेब आंबेडकर

तुमचे मत लिहा .
१ ) शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे लागतात ?

उत्तर: १) देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे. २)परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन. ३)रोजगार निर्मिती. ४)शिक्षण व आरोग्य सेवा. ५)उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन. ६) दुर्बल घटकांचे संरक्षण. ७)महिला , बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात .

२ ) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक म्हणून का साजरा करतो ?

उत्तर: २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकृत केले त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून संविधानातील तरतुदींनुसार देशाचा राज्यकारभार चालण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस आपण ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो.

३ ) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे .

उत्तर: १) शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो . त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते . २) संविधानात नागरिकांचे व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो . शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते . ३) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार क म्हणजे कायदयाचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे . कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो . ४)संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो . त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात . सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते . ५) संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते . त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते . त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता , मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते . ६)नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते . हे संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे आहेत.

उपक्रम
१ ) संविधान सभेसाठी विविध समित्यांची स्थापन झाली . त्यांच्याविषयी माहिती मिळवा समित्यांच्या नावांचा तक्ता तयार करा आणि नावांसह चित्रांचा संग्रह करा .

२ ) ‘ संविधान दिन ‘ शाळेत कसा साजरा झाला त्याचा अहवाल तयार करा .

३ ) संविधान सभेतील सदस्यांच्या फोटोंचा संग्रह करा.

Leave a Comment